अवकाळी पावसामुळे सोमवारी संपूर्ण शहर आणि उपनगरात अक्षरशः गोंधळ उडाला. नाले आणि गटारातील सांडपाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली. परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने तातडीने शहरातील नाल्यांची सफाई सुरू केली. मंगळवारी शिवाजी रोडवरील नाल्याची स्वच्छता करण्यात आली. मात्र, नागरिकांनी शहरातील सर्व नाले आणि गटारी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.
पावसामुळे शहर जलमय, सांडपाणी रस्त्यावर
सोमवारी संध्याकाळी जोरदार पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढले. जवळपास तासभर झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी तुंबले. गटारीतून पाणी वाहण्यास अडथळे आल्याने केरकचरा आणि सांडपाणी रस्त्यावर साचले. फोर्ट रोड आणि येडियुराप्पा रोड तळ्यासारखे दिसू लागले, तर कांदा मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना गुडघाभर पाण्यात बसून व्यवसाय करावा लागला.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप
महापालिकेच्या आरोग्य आणि बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत नाल्यांची सफाई पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतरच ही प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे सांगण्यात आले होते. सोमवारी झालेल्या पावसाने प्रशासनाच्या दुर्लक्षाची पोलखोल झाली, आणि महापालिका तातडीने कामाला लागली.
शिवाजी रोडवरील नाल्याची स्वच्छता
प्रभाग क्र. 10 मधील शिवाजी रोडवरील नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचरा अडकल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी ही समस्या महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक आनंद पिंपळे यांनी जेसीबीच्या साहाय्याने नाला स्वच्छ केला. मात्र, फक्त एका नाल्याची सफाई करून उपयोग नाही. संपूर्ण शहर आणि उपनगरातील सर्व नाल्यांची आणि गटारींची स्वच्छता करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
ग्रामीण भागातही पावसाचा कहर
तालुक्याच्या पश्चिम भागातही पावसाने हाहाकार माजवला. बेळगाव-रामघाट रोडवरील क्रांतीनगर ते बेनकनहळ्ळी गावाच्या नाल्यातील केरकचरा आणि प्लास्टिक रस्त्यावर वाहत आल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. रस्त्याच्या मधोमध कचरा अडकल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. मंगळवारी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला साचलेला गाळ आणि कचरा काढण्यात आला.
शहरातील नाले आणि गटारी वेळेवर स्वच्छ न केल्यास पावसाळ्यात आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे महापालिकेने तातडीने सर्व नाले आणि गटारी स्वच्छ करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.










Leave a Reply