मलप्रभा नदीवरील पर्यायी पुलाला पाण्याचा धोका; बेळगाव–चोर्ला मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद, प्रवाशांना मोठा मनस्ताप
बेळगाव जिल्ह्यातील चोर्ला- कुसमळी परिसरातील मलप्रभा नदीवरील पर्यायी पुलाला पावसामुळे जलप्रवाहाचा धोका निर्माण झाल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी (२५ मे) बेळगाव–चोर्ला राज्य महामार्गावरील वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली. यामुळे बेळगाव ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
ब्रिटिशकालीन पुलाचा इतिहास व सध्याची स्थिती
कुसमळीजवळील मलप्रभा नदीवर सुमारे १०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल जुनाट व कमकुवत झाल्यामुळे तो वाहतुकीस धोकादायक ठरला होता. त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. संबंधित मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जानेवारी २०२५ मध्ये जुन्या पुलाचे विध्वंसन करण्यात आले आणि शेजारी नव्या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, सहापैकी तीन कमानींवर स्लॅब घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन कमानींवरील काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे दीड ते दोन महिने कालावधी लागण्याची शक्यता आहे.
पर्यायी पुलालाही जलप्रवाहाचा धोका
नवीन पूल पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी माती भराव करून उभारण्यात आलेल्या पर्यायी पुलाचा वापर सुरू होता. मात्र, मागील आठवडाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. देवाचीहट्टी, तोराळी आणि आमटे येथील बंधाऱ्यांवरील फळ्या काढल्याने अचानक जलप्रवाह वाढला आणि पर्यायी पूल धोक्याच्या स्थितीत गेला. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतूक वळवण्याचा निर्णय आणि पर्यायी मार्गाचे आव्हान
बेळगाव-चोर्ला महामार्ग बंद झाल्यामुळे प्रशासनाने जांबोटी-खानापूर मार्गे वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, या मार्गाची रुंदी कमी असून घाटाचा वळणावळणाचा परिसर आणि खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांकडून बेळगाव–गोवा मार्गासाठी अधिक सक्षम पर्यायी रस्त्याची तातडीने गरज असल्याची मागणी होत आहे.










Leave a Reply