अनगोळमधील शिवशंभू भक्तांच्या वतीने बलिदान मासाची सांगता धर्मवीर संभाजी चौकातील श्री शिवशंभूतीर्थ स्मारक येथे मोठ्या भक्तिभावाने पार पडली. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या कालावधीत शिवशंभू भक्तांनी बलिदान मास श्रद्धेने पाळला.
अनगोळ विभागातील कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास गावातील प्रत्येक गल्लीत उत्साहात आणि गांभीर्याने साजरा केला. शनिवारी सायंकाळी रघुनाथपेठ येथील मारुती मंदिरातून धर्मवीर संभाजी महाराज ज्वालेची मूक पदयात्रा संपूर्ण अनगोळ भागात काढण्यात आली. या भावपूर्ण सोहळ्यानंतर शिवशंभूतीर्थ स्मारकाजवळ ज्वाला शांत करण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान संपूर्ण हिंदू समाजाच्या स्मरणात रहावे, यासाठी त्यांच्या प्रतिकात्मक चितेला विधिवत मंत्राग्नी देण्यात आला. गावातील महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी भरत कुरणे यांनी शिवशंभू भक्त व धारकरी यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शौर्य, त्याग आणि हिंदवी स्वराज्यावरील निष्ठेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांचे मन भारावून टाकले.










Leave a Reply