पावसाळा सुरू होताच खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलं आणि मनमोहक धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी वन विभागाने या भागात पर्यटकांना प्रवेशास कडक बंदी घातली आहे.
विशेषतः सोशल मीडियावर व्हायरल व्हायला उत्सुक असलेल्या तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती काही धोकादायक ठिकाणी आढळून येत असल्यामुळे वन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
खानापूर तालुका हा बिबट्या, वाघ यांसारख्या वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास आहे. या भागात मोडणारी पावसाळ्यातील मुसळधार पावसामुळे धबधबे आणि निसर्गरम्य स्थळे अधिकच धोकादायक ठरतात. यामुळे बेळगावसह गोवा आणि परिसरातील पर्यटकांनी येथे न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अलीकडेच काही पर्यटकांनी तपासणी नाकेचुकवून वज्रपोहा धबधब्यावर चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर पोस्ट व्हयरल केले. यानंतर संबंधित पर्यटकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्यांना त्यांच्या पालकांच्या माहितीनंतरच सोडण्यात आले असून, यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी चेक पॉइंट्स आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
भीमगड वन्यजीव अभयारण्यासारख्या संवेदनशील भागांत प्रवेश आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. वन विभागाने सर्व पर्यटकांना नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आणि पावसाळ्यात अशा ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा, कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.










Leave a Reply