‘गीत रामायण’ कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त बेळगावात सुरेल सादरीकरण
बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली यांच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव यांच्या वतीने रविवारी (ता. २५ मे) विशेष ‘गीत रामायण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा भावमय कार्यक्रम शांतीनगर, मंडोळी रोडवरील आर्ष विद्या आश्रमात पार पडला. कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात ‘स्वरामृत ग्रुप, बेळगाव’ या प्रतिष्ठित संगीत मंडळाच्या कलाकारांनी गीत रामायणातील २२ निवडक गीते सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मराठी भाषा प्रेमी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कलाकारांचा सन्मान करून त्यांचे मनोबल वाढवले.
कार्यक्रमामध्ये स्वरामृत ग्रुपचे रवींद्र वामनाचार्य, शेखर प्रभू खानोलकर, शुभांगी कारेकर, पद्माताई नाडगौडा, गजानन कुलकर्णी, सुहास बोंद्रे यांनी गायन व संगीत सादर केले. वाद्यसाथ म्हणून गजानन कुलकर्णी (तबला), शेखर प्रभू खानोलकर (हार्मोनियम) आणि सुधीर बोंद्रे (टाळ) यांनी आपल्या कौशल्याची चमक दाखवली. कार्यक्रमाचे सुरेख निवेदन रवींद्र वामनाचार्य यांनी केले.

या निमित्ताने मराठी भाषा प्रेमी मंडळ शतक महोत्सवी कार्यकारी समितीचे अध्यक्ष सुहास गुर्जर, तसेच पदाधिकारी नितीन कपिलेश्वरकर, कुमार पाटील, संकेत कुलकर्णी, विलास पेडणेकर, प्रा. दत्ता नाडगौडा, किशोर काकडे, आर्ष विद्या आश्रमातर्फे सोमनाथ साळुंखे, विविध संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व अनेक मान्यवर उपस्थित होते.










Leave a Reply