तिलारी घाटातून एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी कोल्हापूर विभाग नियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज २ एप्रिलपासून घाटातून बस / एसटी (State Transport) वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल
सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चंदगडच्या अहवालानुसार २० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत तिलारी घाट एसटीसह अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला होता. मात्र, या निर्णयामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी आणि कामगारांचे मोठे हाल झाले. प्रवाशांना आंबोली आणि चोर्ला घाट मार्गे लांब वळसा घ्यावा लागत होता, परिणामी अधिक वेळ आणि खर्च होऊ लागला.
एसटी सुरू करण्यासाठी आंदोलने आणि उपोषण
तिलारी घाटातून एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गडहिंग्लज प्रांताधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना घाटाची पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले.
तरीही, चंदगड सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एसटी विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने हा प्रश्न रखडला होता. अखेर, स्थानिक ग्रामस्थ प्रविण गवस, दत्ताराम देसाई, माजी सरपंच अंकुश गावडे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सतत आंदोलन आणि उपोषण केल्यानंतर प्रशासन नरमले.
रस्त्याच्या दुरुस्तीमुळे मार्ग मोकळा
तिलारी घाटातील खचलेल्या रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाने एसटी विभागाला अधिकृत पत्र पाठवून माहिती दिली. तसेच, आमदार शिवाजी पाटील यांनीही घाटातून एसटी सुरू करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.
सुरक्षिततेवर भर
एसटी विभागाने घाटातील धोकादायक ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
नव्या सुरुवातीसाठी प्रवाशांमध्ये उत्साह
तिलारी घाटातून एसटी सुरू होत असल्याने स्थानिक प्रवासी, विद्यार्थी आणि रोजंदारीवर जाणाऱ्या कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता प्रवास अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर होणार आहे.










Leave a Reply